मोहन भागवत: हिंदूंनी तीन अपत्यांना जन्म द्यावा – सरसंघचालक मोहन भागवत; संघ सांगेल, तेव्हा पदावरुन पायउतार
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये आयोजित ‘संघ प्रवासाची १०० वर्षे, नवे क्षितीज’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदूंनी किमान तीन अपत्यांना जन्म द्यावा, असे आवाहन केले. तसेच आपल्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले.
बातमी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर
Install
लोकसंख्या संतुलनासाठी ‘तीन मुले’ आवश्यक
सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्याशास्त्राचा दाखला देत सांगितले की, कोणत्याही समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लोकसंख्या वाढीचा दर २.१ टक्क्यांच्या वर असणे आवश्यक असते. जर हा दर कमी झाला, तर तो समाज हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर जातो.
महत्वाचे मुद्दे:
-
शास्त्र आणि तज्ज्ञांनुसार: तीन अपत्ये असल्यास पालकांचे आरोग्य सुदृढ राहते.
-
मुलांचे संगोपन: तीन भावंडे असल्यास मुलांमध्ये ‘इगो मॅनेजमेंट’ (अहंकार व्यवस्थापन) आपोआप विकसित होते.
-
सामाजिक सुरक्षा: देशाच्या आणि धर्माच्या भविष्यासाठी लोकसंख्या संतुलित राहणे गरजेचे आहे.
७५ व्या वर्षी निवृत्ती? सरसंघचालकांनी दिले स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून मोहन भागवत यांच्या वयावरून आणि निवृत्तीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यावर भाष्य करताना भागवत म्हणाले, “आमच्याकडे ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर पद सोडण्याची पद्धत आहे. मी स्वतः ७५ वर्षांचा झाल्यावर पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, संघाच्या कार्यकर्त्यांनी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मला कामात राहण्याचा आग्रह केला.”
मोहन भागवत पुढे म्हणाले की, संघात निवृत्तीचा कोणताही कडक नियम नाही. “जोपर्यंत शरीर साथ देत आहे आणि जोपर्यंत संघ सांगेल, तोपर्यंत मी कार्यरत राहीन. ज्या दिवशी संघ मला पायउतार व्हायला सांगेल, त्या दिवशी मी पद सोडेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सरसंघचालक पदासाठी जात महत्त्वाची नाही
याच कार्यक्रमात त्यांनी संघाच्या समावेशकतेवरही भाष्य केले. सरसंघचालक होण्यासाठी तो केवळ ब्राह्मण असावा ही अट चुकीची आहे. कोणताही हिंदू जो समर्पित भावनेने काम करतो, तो या पदावर पोहोचू शकतो. अनुसूचित जाती किंवा जमातीमधील व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकते, असे मोहन भागवत यांनी ठासून सांगितले.
मोहन भागवत यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा लोकसंख्या धोरणावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. विशेषतः ‘हिंदूंनी तीन मुले जन्माला घालावीत’ या त्यांच्या विधानाचा सामाजिक आणि राजकीय स्तरावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.







