हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून पुण्यात भाजप-काँग्रेस आमने-सामने; काँग्रेस भवनाबाहेर जोरदार राडा
पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर आज भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्याचे रूपांतर दगडफेक व हाणामारीत झाले. या घटनेत काही गाड्यांचे नुकसान झाले असून एक काँग्रेस कार्यकर्ता जखमी झाला आहे.
भाजपच्या गुंडांनी हल्ला केला; हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप
या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, “पुण्यातील भाजपचे गुंड जाणीवपूर्वक काँग्रेस कार्यालयावर चालून आले. पोलिसांनी उपस्थित असतानाही महिला कार्यकर्त्यांवर आणि पत्रकारांवर हल्ला करण्यात आला.” सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बातमी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर
Install
दंगली घडवण्याचा भाजपचा डाव?
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “माझ्या विधानाचा विपर्यास करून राज्यात दंगली घडवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे,” असा दावा त्यांनी केला. पुण्यातील भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि इतर नेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याशी केली होती. टिपू सुलतान हे देशाचे भूमिपुत्र असून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, असे विधान त्यांनी केले होते. या विधानामुळे हिंदू संघटना आणि भाजप आक्रमक झाली असून, राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत.
पुण्यात काय घडले?
आज दुपारी भाजप कार्यकर्ते घोषणाबाजी करत पुणे काँग्रेस भवनापाशी पोहोचले. तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांनीही प्रतिघोषणा दिल्या. यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक व बाटल्या फेकण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेमुळे पुणे शहरात काही काळ दहशतीचे वातावरण होते.
सध्या पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पोलीस आता या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दंगलखोरांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








