अयोध्येतील भव्य राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या दानावर डल्ला मारणाऱ्या आरोपींबाबत विशेष तपास पथकाने (SIT) मोठे खुलासे केले आहेत. काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात, महिना केवळ १४ ते १५ हजार रुपये कमावणारे कर्मचारी आता चक्क आलिशान गाड्या आणि घरांचे मालक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून या कर्मचाऱ्यांनी पैशांची अफरातफर केली आणि आपली आर्थिक स्थिती रातोरात बदलून टाकली.
कसे उघड झाले राम मंदिर दान चोरीचे सत्य?
एसआयटीने केलेल्या सखोल चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मंदिरातून दररोज अंदाजे ६ ते ८ लाख रुपयांची चोरी होत असल्याचा प्राथमिक अंदाज तपास अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
आरोपींची अफाट संपत्ती
या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश शुक्ला हा पूर्वी हनुमान गुहेजवळ पिण्याचे पाणी विकायचा. दान मोजणी केंद्रात नोकरी लागल्यानंतर अल्पावधीतच त्याने अयोध्येत स्वतःचे घर बांधले आणि नुकतीच पोलिसांनी त्याची ब्रेझा (Brezza) कार जप्त केली आहे. दुसऱ्या आरोपीने, लवकुश मिश्राने, २५ लाख रुपये बाजारभाव असलेला एक मोठा प्लॉट अवघ्या ८ लाख ८० हजारांत खरेदी केला आहे. तर रामशंकर यादव उर्फ ‘टिन्नू’ याने चोरीच्या पैशांतून थेट एक हॉस्टेलच उभे केल्याचे उघड झाले आहे.
चोरी करण्याची धक्कादायक पद्धत
राम मंदिर दान चोरीचा हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ५ आरोपी संशयास्पदरीत्या पैसे लपवताना कैद झाले आहेत. मोजणी करताना हे कर्मचारी खिसे आणि मोज्यांमध्ये पैसे लपवायचे. त्यानंतर हे पैसे तात्पुरते बाथरुममध्ये ठेवून नंतर हळूच मंदिराबाहेर नेले जायचे. मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे घालणे बंधनकारक असतानाही, या महत्त्वाच्या नियमाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले.
महाकुंभ दरम्यान झाली सर्वाधिक लूट
२०२५ मधील महाकुंभ काळात जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दररोज १०-१२ लाख लोक येत असल्याने, दान मोजण्यासाठी एका खाजगी एजन्सीमार्फत नवीन कर्मचारी नेमले गेले होते. याच काळात सर्वाधिक चोरी झाल्याचा संशय आहे. आधी मंदिरातून रोज १६ ते १८ लाख रुपये बँकेत जमा व्हायचे, मात्र चोरी पकडली गेल्यानंतर हाच आकडा रोज २४ ते २६ लाखांवर पोहोचला आहे. बदनामीच्या भीतीने सुरुवातीला या राम मंदिर दान चोरी प्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवण्यास उशीर झाला.
सध्या पोलीस प्रशासन केवळ रोख रकमेचाच नाही, तर भाविकांनी दान केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही हिशोब तपासत आहे. या राम मंदिर दान चोरी प्रकरणात ट्रस्टच्या काही सदस्यांच्या शिफारसीवरून कर्मचारी नेमले गेल्याने, आगामी काळात एसआयटीकडून आणखी काही लोकांची कसून चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.





