नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तानमधील ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता अधिकृतरीत्या संपुष्टात आले. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती. मात्र केवळ चार तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करत सीमेपलीकडून गोळीबार आणि ड्रोनद्वारे हल्ले सुरु केले आहेत, त्यामुळे सीमेवरील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पाकिस्तानकडून अखनूर, राजौरी, आर.एस. पुरा आणि पालनवाला सेक्टरमध्ये जोरदार तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. यासोबतच काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात एका संशयित ड्रोनचा स्फोट झाल्याचीही माहिती आहे. या हल्ल्यांमुळे काही ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३.३५ वाजता भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि पाण्यातून होणारे सर्व प्रकारचे हल्ले थांबवण्याचे ठरले होते. ही युद्धबंदी दोन्ही देशांनी मान्य केली होती आणि १२ मे रोजी पुढील चर्चा नियोजित होती. मात्र पाकिस्तानकडून पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली असून सायरन वाजवत स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक संघर्षाचा व्हिडीओ ट्विट करत विचारले आहे की, “शस्त्रसंधीचं काय झालं?

सध्या सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण असून भारतीय लष्कर सतर्क आहे. पुढील कारवाईबाबत अधिकृत प्रतिक्रिया आणि निर्णयाची प्रतीक्षा आहे.